Logo

डॉ. आंबेडकरांची अविस्मरणीय पत्रकारिता

- 29/05/2020   Friday   4:12 pm
डॉ. आंबेडकरांची अविस्मरणीय पत्रकारिता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात दलित पत्रकारितेच्या रुपाने केलेली कामगिरी मोलाची आहे. त्यांनी मूकनायक (३१ जानेवारी १९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) अशी चार पत्रे चालविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज समता संघाचे अध्यक्ष होते व समता हे या संघाचे मुखपत्र होते.

डॉ. आंबेडकरांची काही समाजसुधारकांसह शाहूमहाराजांशी १९१९ साली मुंबईत भेट झाली. या भेटीत वर्तमानपत्राची कल्पना मांडण्यात आली. महाराजांना ती पसंत पडल्यामुळे त्यांनी लगेच डॉ. आंबेडकरांना अडीच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले. त्यातून मूकनायकचा जन्म झाला. ब्राह्मणेत्तरांची पत्रकारिता दलितांच्या प्रश्नाला न्याय देऊ शकली नाही, एवढे एकच कारण मूकनायक सुरु करण्यामागे नव्हते. १९१७ साली हिंदूस्थानातील विविध जातिजमातींच्या मताधिकाराविषयी चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘साउथबरो’ आयोग नेमला होता. या आयोगापुढे दलितांची कैफियत नीटपणे मांडली गेली नाही, या जाणिवेतून ते पत्रकारितेकडे वळले. मूकनायकाचे संपादकत्व त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या तरुणाकडे सोपविले. मूकनायकमधून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे प्रश्न मांडले, तरी त्या काळी ते चळवळीचे मुखपत्र बनू शकले नाही कारण मूकनायक सुरु झाल्यावर काही महिन्यांतच-म्हणजे ५ जुलै १९२० रोजी-अभ्यासासाठी डॉ. आंबेडकर लंडनला गेले. तेथून ते ३ एप्रिल १९२३ रोजी भारतात परतले. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली, त्यातूनच ३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक पत्र उदयाला आले.


मूकनायक दर शनिवारी प्रसिद्ध होई. शीर्षकाच्या डावीकडे वर्गणीचे दर, तर उजवीकडे जाहिरात असे. किरकोळ अंकाची किंमत दीड आणा होती. का. र. मित्र यांच्या मनोरंजन छापखान्यात ते छापले जाई. अंकात पहिल्या पानावर, शीर्षकाखाली (मास्टहेड) तुकाराम महाराजांच्या अभंगातील पुढील ओळी बिरुदावली म्हणून छापण्यात येत :


काय करु आता धरुनिया भीड I निःशंक हे तोंड वाजविले II


नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण I सार्थक लाजून नव्हे हित II


मूकनायकमध्ये डॉ. आंबेडकरांनी चौदा लेख लिहिले. डॉ. आंबेडकर परदेशात गेल्यावर मूकनायकची आबाळ झाली. पुढे भटकर यांच्याकडून ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांनी सूत्रे हाती घेतली तथापि १९२३ मध्ये मूकनायक बंद पडले.


बहिष्कृत भारतचे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक डॉ. आंबेडकर हेच होते. त्याचा उल्लेख त्यांनी पाक्षिक पत्र असा केला आहे. छापखाना बदलणे, वर्गणीदारांकडून वेळेवर वर्गणी न येणे, अंक वेळेवर न निघणे या अडचणींना सामोरे जावे लागले, तरी डॉ. आंबेडकरांनी निर्धाराने हे पत्र चालविले. एका शुक्रवारी बहिष्कृत भारत व एका शुक्रवारी समता असा प्रयोगही त्यांनी काही काळ केला. बहिष्कृत भारत सुरु करण्यापूर्वी बहिष्कृत फंडासाठी डॉ. आंबेडकरांनी आवाहन केले परंतु फारसा प्रतिसाद लाभला नाही. एकूण दोन वर्षांच्या काळात सु. नऊ महिने हे पत्र बंद राहिले. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पत्र बंद पडले.त्यानंतर एका वर्षात-म्हणजे २४ नोव्हेंबर १९३० रोजी-जनताचा पहिला अंक प्रकाशित झाला. देवराव विष्णु नाईक हे त्याचे संपादक होते. जनता प्रथम पाक्षिक होते मग ते ३१ ऑक्टोबर १९३१ रोजी साप्ताहिक झाले. जनताच्या किरकोळ अंकाची किंमत दीड आणा व वार्षिक वर्गणी दोन रुपये दहा आणे होती. जनता या शीर्षकाखाली इंग्रजीत द पीपल असे लिहिलेले असे. आपल्या व्यापामुळे डॉ. आंबेडकरांना लेखनासाठी पुरेशी सवड मिळत नसे परंतु सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात ते आवर्जून लिहीत. जनता पत्र पंचवीस वर्षे (१९५५ पर्यंत) नियमितपणे चालले. भा. द. कद्रेकर, गं. नी. सहस्रबुद्धे, बी. सी कांबळे आणि यशवंतराव आंबेडकर यांसारख्यांनी जनताचे संपादकपद सांभाळले. जनताचे प्रबुद्ध भारत असे नामांतर ४ फेब्रुवारी १९५६ रोजी करण्यात आले. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर या पत्रासाठी संपादक मंडळ नेमण्यात आले. संपादक म्हणून यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दा. ता. रुपवते, शंकरराव खरात व भा. द. कद्रेकर यांनी क्रमाक्रमाने जबाबदारी सांभाळली. ३ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर प्रबुद्ध भारत हे त्या पक्षाचे मुखपत्र बनले. १९६१ साली हे साप्ताहिक अंतर्गत वादामुळे बंद पडले.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक विषय हाताळले. धर्मसंस्था, धर्मविचार आणि जातींची उतरंड यांचा त्यांनी मागोवा घेतला. हिंदू समाजव्यवस्थेची आणि अस्पृश्यांच्या इतिहासाची त्यांनी बुद्धिवादी चिकित्सा केली. महाडचा सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह, महारांची वतने, गिरणीमालक व कामगार, खोतीचे प्रश्न, गुलामगिरी असे अनेक विषय त्यांनी हाताळले. वृत्तपत्र हे मतपत्र असते, असे ठामपणे सांगून डॉ. आंबेडकरांनी हे लेखन केले आहे. निखळ, लख्ख मराठी भाषेत ते लिहीत. त्यांचे विवेचन तर्कशुद्ध असे. ‘हिंदू धर्माला नोटीस’ व ‘अस्पृश्यता-निवारणाचा पोरखेळ’ यांसारखे त्यांचे लेख अविस्मरणीय ठरले आहेत.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: